मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्तीनं तिच्या सोशल मीडियावरील नाव बदललून तृप्ती अक्कलवार असं केलं आहे. तिनं नावामधील जाधव हे अडनाव हटवल्यानं सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ हा तृप्ती आणि त्याच्या दोन मुलींसोबत ट्रीपला गेला होता. त्यावेळी सिद्धार्थनं केवळ मुलींसोबतचे फोटो शेअर केले होते.
गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती हे एकत्र राहात नाहीत. पण सिद्धार्थ आणि तृप्तीनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. सिद्धार्थ आणि तृप्ती यांची २००७ मध्ये लग्नगाठ बांधली गेली. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. सिद्धार्थ आणि तृप्तीनं स्टार प्लस वरील नच बलिये या शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमधील तृप्ती आणि सिद्धार्थच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तेव्हापासून या जोडीचे अनेक फॅन्स समोर आले. पण त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने चाहत्यांना हैराण केले आहे.
गुण्यागोविंदाने चालणारा त्यांचा हा सुखी संसार मोडणार असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे चाहते काळजीत पडले आहेत.
सिध्दार्थ आणि तृप्तीची प्रेमकहाणी तशी रंजक आहे. जेव्हा तो देवेंद्र पेम यांच्याकडे ‘रामभरोसे’ या नाटकासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. या नाटकासाठी ऑडिशन घेणे सुरु होते.
या ऑडिशनसाठी तृप्ती अक्कलवार ही पण आली होती. तृप्तीही त्यावेळी नाटकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करत असे. ज्यावेळी ती या ऑडिशनसाठी आली, त्यावेळी ती जर्नलाझिम करत होती. तिने ऑडिशन उत्कृष्ट दिली. सिद्धार्थला तर पहिल्याच भेटीत ती आवडली होती. सिद्धार्थला तिचा बिनधास्तपणा आवडला होता.
त्या४ ते ५ दिवसांच्या काळात सिद्धार्थला तिच्याबद्दल प्रेम निर्माण झाले होते. तृप्ती आता भेटणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्याने तिला प्रपोज करायचे ठरवले होते. ते दोघेही एल्फिन्स्टन स्टेशनवर उतरत असत. त्यावेळी सिद्धार्थने स्टेशनच्या तिकीट खिडकीजवळ, आजूबाजूला प्रचंड गर्दी, यात त्याने तृप्तीला थेट लग्नाची मागणी घातली.
तृप्तीला सिद्धार्थ तिच्या मागे आहे, याची कल्पना होती. परंतु, तो इतक्या लवकर प्रपोज करेल आणि थेट लग्नाची मागणी घालेल, असे वाटले नव्हते. त्यामुळे तिला हा आश्चर्याचा धक्का होता. तिने तिथेच त्याला नकार कळवला. पण सिद्धार्थने लगेच तिला मैत्रीचा दुसरा प्रस्ताव दिला. मग कालांतरांनी भेटीगाठी वाढल्या, सततच्या संवादाने दोघेही एकमकांकडे आकर्षित झाले. त्यावेळीही सिद्धार्थ तृप्तीला म्हणायचा की, जेव्हा तू लग्नाचा विचार करशील तेव्हा माझ्या नावाचा जरुर विचार कर. पण तृप्तीला त्याच्याबद्दल अजून आकर्षण निर्माण झाले नव्हते.
काही काळाने तिलाही नंतर सिद्धार्थबाबत आकर्षण निर्माण झाले. आपण सिद्धार्थसारखा चांगला मित्र गमवायला नको, हे तिला जाणवले. मग तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली, आणि तब्बल ४ ते ५ वर्षांनी तिने सिद्धार्थला होकार दिला. आणि साल २००७ मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या या नात्याला आता कायमचा पूर्णविराम मिळणार आहे.