छोटया पडद्यावरील डेलीसोप क्विन अर्थात एकता कपूरने आजवर अनेक यशस्वी मालिका बनवल्या त्यापैकी काही ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘कुसुम’ आणि ‘बेपनाह प्यार’ या होत्या. पण तुम्हाला माहित आहे का? यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री एकता शर्मा आज अनेक अडचणींना तोंड देते आहे आणि याची खबर देखील कोणाला नाही..
एकता आता बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर आहे. गेल्या काही वर्षांत तिच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. याच दरम्यान तिला कोणत्याही मालिकेत कुठलंही काम मिळत नव्हतं. शेवटी घर चालवण्यासाठी तिने एका कॉल सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. एकता शर्मा सध्या तिच्या आईसोबत भाड्याच्या घरात राहते.
View this post on Instagram
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत एकताने तिच्या सध्या सुरू असलेल्या संघर्षावर भाष्य केलं आहे. त्यासोबत टीव्ही इंडस्ट्रीवर नाराजी व्यक्त केली. साल २०२० मध्ये बेपनाह प्यार या मालिकेत ती शेवटची दिसली होती. कोरोना महामारीत तिच्यावर वाईट वेळ आली होती. त्यानंतर तिला पुन्हा कामच मिळालं नाही.
एकता शर्मा या मुलाखतीत म्हणाली, “मला अभिनयाच्या ऑफर्स मिळत नव्हत्या. त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. फक्त घरी बसून अभिनयाची चांगली संधी येण्याची मी वाट पाहू शकत नव्हती. मला माझं काम आवडतं आणि मला लवकरच अभिनयक्षेत्रात परत यायचं आहे. मी सतत ऑडिशन्स आणि लुक टेस्ट देत असते. मला आशा आहे की लवकरच काहीतरी चांगलं होईल.
ती पुढे म्हणाली, दोन दशके टीव्हीसाठी काम करून सुद्घा आज मला काम मिळत नाही ही दु:खद गोष्ट आहे. अशावेळी अॅक्टींगच्या ऑफर्स मिळत नसल्याने कॉल सेंटरमध्ये काम करावं लागलं. कॉल सेंटरमध्ये काम करणे ही वाईट गोष्ट नाही. कोणतेही काम मोठे किंवा लहान नसते,असे ती पुढे म्हणते.
दरम्यान, ती आपल्या वडिलांचे आभार व्यक्त करत म्हणाली, ‘मी माझ्या दिवंगत वडिलांची आभारी आहे. त्यांनी मला अभिनयात जाण्यापूर्वी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून मी माझे शिक्षण पूर्ण केले. आणि यामुळेच आज मी पैसे कमवून स्वतःला सांभाळत असल्याचे तिने यावेळी सांगितले. मला माझ्या इंडस्ट्रीतल्या लोकांना खुप राग येतो,कारण ते कधीच माझ्या मदतीला आले नाही. याउलट माझ्या ऑफिस स्टाफने मला खूप मदत केली,” असे तिने सांगितले.
ती तिच्या करिअरमध्येच संघर्ष करत नाहीये तर तिच्या वैयक्तिक आयुष्यात बरीच उलथापाल चालू आहेत. सध्या ती अभिनेत्री तिच्या आठ वर्षांच्या मुलीच्या ताब्यासाठी न्यायालयीन लढा देत आहे.अशा कठीण परिस्थितीतही तिने आशा सोडलेली नाही. लवकरच परिस्थिती सुधारेल असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.